भुतांची जत्रा

नगरपासून वीस किलोमीटरवर असलेले आगडगाव. माणसांची जत्रा संपली की, दुसऱ्या दिवशी तेथे भुताची जत्रा भरते, असे मानतात. अंधश्रद्धेचे स्तोम न माजविता गावकरीही यामागील कार्यकारणभाव शोधत आहेत. दर रविवारी तेथे मिळणारा आमटी भाकरीचा महाप्रसादही प्रसिद्ध आहे.
……..
भैरवनाथाची यात्रा संपली की, सायंकाळी सर्वांना तातडीने घरी परतायचे वेध लागतात. बाहेरहून आलेली मंडळी आपापल्या गावी निघून जातात. गावातील मंडळीही मंदिर परिसर सोडून गावात जातात. दुसऱ्या दिवशी कोणीही मंदिराकडे फिरकत नाही, कारण त्या दिवशी रात्री तेथे भुतांची जत्रा भरते, असे मानले जाते. अंधश्रद्धा म्हणून याचे स्तोम माजविण्यात आलेले नाही, मात्र गावातील लोक यावर प्रथा म्हणून विश्वास ठेवतात. मुख्य म्हणजे असे का मानले जाऊ लागले, याचा शोध घेण्याचाही गावकरी प्रयत्न करीत आहेत.
नगर जिल्ह्यातील आगडगाव येथील हे वैशिष्टय. नगरपासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे काळ भैरवनाथाचे पुरातन देवस्थान. छोटेच, पण टुमदार मंदिर तेथे आहे. त्यावर शिलालेख नाही. मात्र, मोठमोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्तींनीच बांधले असावे, असा अंदाज बांधला जातो. पुराणात असलेल्या नोंदीवरून आगडमल, रतडमल आणि देवमल या राक्षसांनी त्याचे बांधकाम केल्याचे सांगितले जाते. या परिसरात आडगाव, रतडगाव आणि देवगाव या नावांची तीन गावे शेजारीशेजारीच आहेत. त्यांच्या नावांवरून याला दुजोरा मिळतो. आणखी एक दुजोरा देणारी गोष्ट म्हणजे मंदिरांच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रे कोरलेली आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. त्या घडीव व स्थानबद्ध मूर्ती हलविता येत नाहीत. मंदिराच्या शेजारी एक जुना कडुनिंब आहे. त्याची पाने मात्र गोड लागतात. त्याला बहर येतो, पण लिंबोळ्या लागत नाहीत. त्यामुळे कित्येक वर्षांत त्याचे एकही दुसरी रोपटे तयार झालेले नाही. असे हे अजब ठिकाण. या मंदिराचे बांधकाम केव्हा झाले हे निश्चित सांगता येत नाही. देवस्थानजवळ निस्पृह बाबांची गादी आहे. बाबांचे निधन झाल्यानंतर त्याच परिसरात त्यांची समाधी बांधली जाते. अशा २४ समाधी तेथे आहेत. यावरून २४ पिढ्यांपेक्षा जुना इतिहास याला असल्याचे मानले जाते.
चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी येथे जत्रा भरते. पूर्वी तेथे पशुहत्या होत होती. अलीकडे काही वर्षांत गावकऱ्यांच्या, विशेषतः तरुणांच्या पुढाकारातून ही प्रथा बंद झाली. चोहोबांजूनी डोंगर आणि मधल्या दरीत मंदिराचा परिसर आहे. तेथेच मोठमोठे जुने वृक्ष आहेत. तेथे ही जत्रा भरते. रविवारी माणसांची जत्रा झाल्यावर सोमवारी भुतांची जत्रा असते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी त्या परिसरात कोणी जाऊ नये,असा संकेत असून गावकरी तो पाळतात. हा नियम पाळण्यासाठी कोणाला सक्ती केली जात नाही. भुताची जत्रा म्हणजे नेमके काय, याची अनेकांना उत्सुकता आहेच. याच उत्सुकतेपोटी अनेकदा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विविध कारणांनी त्याला यश आले नाही. त्याच्याही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. नव्या पिढीनेही हे मान्य केले असून त्यांचे म्हणणे असे की, जर यात अंधश्रद्धा म्हणून कोणी स्तोम माजवत नसेल, त्याचा गावकऱ्यांना काही त्रास नसेल, तर भुतांची जत्रा असते असे मानण्यास काय हरकत आहे. त्यामुळे या दिवशीच्या रात्री तेथे जाऊन पाहण्याचे प्रयत्न आता केले जात नाहीत.
कोणाला करायचे असले तर गावकऱ्यांचा त्याला विरोध नसतो, मात्र गावकरी यामध्ये सहभागी होत नाहीत.
ही भुतांची जत्रा नेमकी केव्हापासून सुरू झाली, याचीही नेमकी माहिती उपलब्ध नाही. गावातील जुन्या पिढीतील लोक सांगतात की, खूप वर्षांपूर्वी गावातील गोपीनाथ कर्पे हे यात्रेच्या दिवशी आपली तेलाची घागर मंदिरातील दीपमाळेजवळ विसरले. त्यांना दुसऱ्या दिवशी रात्री त्याची आठवण झाली. त्यामुळे ते घागर आणण्यासाठी मंदिराजवळ गेले. तेव्हा त्यांना तेथे विचित्र आकृत्या नाचताना दिसल्या. त्यांनी ही माहिती त्यावेळी गावकऱ्यांना दिली होती. त्यांचे पणतू कोंडिबा कर्पे या माहितीला दुजोरा देतात. अर्थात या सांगीव कथा असल्याचे मानले, तरीही भुतांची जत्रा भरते असे मानायचे कारण काय, याची उत्सुकता सर्वांना आहेच. मंदिराचा कारभार पाहणाऱ्या मंडळींनी याचे संशोधन सोडलेले नाही. प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहण्यापेक्षा हे असे मानायला का सुरुवात झाली, याचा ते शोध घेत आहेत.
पूर्वी येथे पशुहत्या होत होती. जेवणावळीही तेथेच उठत. त्यामुळे उष्टी, खरकटी तेथेच टाकली जात. दुसऱ्या दिवशी जर या भागात शांतता ठेवली, तर कुत्री आणि जंगली पशू येऊन टाकलेले अन्न खातील, नैसर्गिकरीत्या साफसफाईचे काम होईल. मात्र, असे कोणी ऐकणार नाही, त्यामुळे भुतांच्या जत्रेचे कारण पुढे आले असावे, असे मानणारा एक मतप्रवाह आहे.
काळभैरव हा शंकराचा स्मशानातील अवतार. शंकर भस्मधारी. त्यांच्याशी भुताचा संबंध असल्याचा उल्लेख अनेक ग्रंथात आढळतो. त्यामुळे आगडगावमध्ये या दैवताशी भुतांचा संबंध जोडून ही अख्यायिका सांगितली जात असावी, असेही मानले जाते. एकदा या गावात आलेल्या भाविकाने तामिळनाडूमधील मीनाक्षी मंदिराचा संदर्भ दिला. तेथे राक्षसाला पाठविण्याचा एक उत्सव होत असल्याचे सांगितले. आगडमल नावाचा राक्षस तेथून महाराष्ट्राच्या दिशेने पाठविला जात असल्याची आख्यायिका आहे. त्याचा काही संदर्भ आहे का, याचाही ट्रस्टतर्फे शोध सुरू आहे.
ही अख्यायिका काहीही असली,तरी अलीकडे एक उत्तम तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणूनही हे प्रसिद्धीला आले आहे. तेथे दर रविवारी भाविकांची मोठी गर्दी होते. येणाऱ्या प्रत्येकाला आमटी-भाकरीचा प्रसाद दिला जातो. भाविकांच्या देणगीतून तयार केली जाणारी मिश्र डाळींची खास आमटी आणि बाजरी-ज्वारीच्या भाकरी यांचे पोटभर जेवण येणाऱ्या सर्वांना दिले जाते. अन्नदानासाठी देणगी देणाऱ्यांनाही आपला नंबर येण्यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते, एवढा याला प्रतिसाद मिळतो.
सरकारने या गावाचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश केला आहे. त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून जशी कामे होत आहेत,तशी सरकारी निधीतूनही होत आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना असलेले ठिकाण आणि आकर्षक मंदिर, तेथे करण्यात आलेली विकासकामे यामुळे दिवसेंदिवस या परिसराचे स्वरुप बदलत आहे, येणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे