महाराष्ट्रातील अष्टविनायक दर्शन

ॐ श्रीगणेशाय नमः

वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणेश महादेव आणि पार्वतीचे पुत्र आहेत. गणपती ही विद्येची देवता असून, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे. त्यांचं वाहन मूषक आहे, गणांचे स्वामी असल्यामुळे त्यांना गणपती म्हणतात. त्यांचे विविध नावे आहेत. त्यांना सर्वप्रथम पूजनाचा मान आहे. अशा या विघ्नहर्ता गणेशाचे आपल्या महाराष्टात आठ तीर्थस्थान आहेत त्याची माहिती आज आपण बघुयात.

श्री मोरेश्वर (मोरगाव)
अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मोरेश्वर ओळखला जातो. मंदिराच्या गाभाऱ्यातील मोरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत. हे मंदिर मोठ्या चौथऱ्यावर आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे.

श्री सिध्दीविनायक (सिद्धटेक)
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे.

श्री बल्लाळेश्वर (पाली)
पालीचा गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा आहे. हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

श्री चिंतामणी (थेऊर)
थेऊरच्या गणपतीला श्रीचिंतामणी म्हणतात. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे.

श्री वरदविनायक (महड)
महडचा वरदविनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.

श्री विघ्नहर (ओझर)
श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. मूर्तीच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे.

श्री महागणपती ( रांजणगाव)
या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

श्री गिरिजात्मज (लेण्याद्री)
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांत आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीव काम, खोदकाम केलेले आहे. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

संकष्ट चतुर्थी

प्रथम पूजनीय गौरी पुत्र श्रीगणेश

पौराणिक कथा आहे. देवी-देवतांमध्ये प्रथम पूजनाचा मान कोणाला मिळावा या विषयावर वाद निर्माण झाला. तेव्हा सर्व देवी-देवतांनी ठरवले की जो कोणी संपूर्ण ब्रम्हांडाला सर्व प्रथम प्रदक्षिणा मारून परत येईल त्यालाच प्रथम पूजनाचा मान प्राप्त होईल.

तेव्हा सगळे देवी-देवतांनी आपल्या वाहनांवर बसून या प्रतियोगितेला सुरुवात केली. त्यामध्ये प्रत्येकाचे विविध वाहने होती. विविध प्राण्यांवर बसून देवी-देवता होते. परंतु गणेशजी विचार करू लागले की आपले वाहन तर उंदीर आहे, त्याची गती तर फारच कमी आहे. गणेशजींनी आपल्या बुद्धीचा वापर केला व पुन्हा विचार केला की आपला संसार-ब्रम्हांड हे सर्व आपले आई वडीलच. त्यांनी आपले आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वतींना प्रदक्षिणा घातली व आपल्या आई व वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती यांच्या सोमोर येऊन बसले.

जेव्हा सर्व देवी-देवता तेथे आले तेव्हा श्री गणेशजींना त्यांनी तिथेच पहिले व त्यांना प्रश्न केला की तुम्ही इथेच का ? तेव्हा गणेशजी बोलले की माझे आई वडील भगवान शिव शंकर व माता पार्वती हेच माझे संसार-ब्रम्हांड आहे त्यांच्यामुळेच मी आहे. श्री गणेजींचे विचार ऐकून सर्वच विचार मग्न झाले. सर्व देवी-देवतानां श्री गणेशजींची आई व वडिलांवरील आस्था, भक्ती पाहून प्रसन्नता वाटली व सर्वांनी गणेशजींना शुभाशीर्वाद दिले. तेव्हापासूनच असे ठरले की कुठलीही पूजा असो प्रथम पूजन हे श्री गणेशजींचे केले जाईल. याच कारणामुळे कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनानंतरच केली जाते. त्यांना प्रथम मान प्राप्त आहे.
कथा तुषार चिंतळे यांच्या शब्दात.