पंचाक्षरी मंत्र महिमा

ॐ नमः शिवाय
आज सोमवार आहे आजचा दिवस भोलेबाबांचा दिवस मानल्या जातो. प्राचीन काळातील एक कथा आहे त्या कथेमध्ये या पंचाक्षरी मंत्राचा महिमा सांगितलेला आहे तो आपण बघणार आहोत.

मथुरेला यादव वंशात शूरवीर,महापराक्रमी, दयाळू, प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, कीर्तिवान असा एक राजा राज्य करत होता त्याचे नाव दाशार्ह होते. त्याने राजनीती नुसार अनेक राज्यांना आपले मांडलिक बनवले होते. आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. त्याच्या सद्गुणांमुळे त्याच्या विशेष आणि उत्तम स्वभावामुळे त्याच्या दरबारी ऋषी-मुनी, गोर-गरीब येत असत त्यांच्या समस्या दूर करणे त्यांना मदत करणे, दान-धर्म करणे असा राज्याचा स्वभाव होता.त्यामुळे ऋषी-मुनी त्याला आशीर्वाद देत. प्रजेचे राजावर खूप प्रेम होते. राजाने विविध कला आत्मसात केलेल्या होत्या. तो सर्वांशी विनम्रतेने वागत असे सर्व राज्याचा आदर करत असत. राजाची कलावती नावाची राणी होती. ती काशीनरेशची राजकन्या होती. राणी फार रूप संपन्न, गुणवान होती.
एके दिवशी राजा राणीची वाट पाहत बसून होता बराच वेळ झाला राणी काही आली नाही. राजा स्वतः राणी जवळ गेला व बोलला हे प्राणप्रिये.. आज माझ्या कडून काही अपराध घडला का ? की माझी प्राणप्रिया माझ्यावर रुसली ? राणी कलावती बोलू लागली हे प्राणनाथ… हे स्वामी आपले काहीही चुकलेले नाही. आपण माझे सर्वस्व आहात. मी आपणास समर्पित आहे. व मी सदैव आपली आज्ञा पाळत असते.परंतु आज मी आपल्या आज्ञेचे पालन करू शकली नाही त्याकरिता क्षमा असावी. कारण मी आज व्रतस्थ आहे. व्रतस्थ असतांना स्त्रीने पतीपासून दूर राहावे असे शास्त्र सांगते. शास्त्राच्या वचनाचे भंग केल्यास, त्याचे प्रायश्चित मला व तुम्हाला भोगावे लागेल. त्यामुळे आज मी आपणाकडे येऊ शकली नाही. त्या करता मला क्षमा करावी. राजाच्या मनात कामवासना बळावली होती, त्यामुळे त्यांनी राणीचे विचार समजून घेतले नाहीत. राणी सांगत होती, मी व्रतस्थ आहे. मला स्पर्श करू नका. परंतु राजाने काहीच न एकता जबरदस्ती राणीला स्पर्श केला. तसे त्याचे हात तीव्र प्रज्वल अग्निकुंडात टाकल्या सारखी अनुभूती त्याला झाली त्याचे हात धगधगत्या आगीला स्पर्श केल्यासारखे भाजून निघाले. राजा घाबरला. त्याने राणीला विचारले हे असे का घडले ?
राणी कलावती राजांना सांगू लागली असे का झाले तर. महर्षी दुर्वासा हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला ‘ॐ नमः शिवाय’ हा पंचाक्षरी मंत्र दिला. त्या मंत्राचा मी अहोरात्र जप करते. या जपामुळे माझे हृदय परमपवित्र झाले आहे. त्यात तुम्ही कामातुर होऊन जबरदस्ती केली आणि त्यातल्या त्यात मी व्रतस्थ असताना माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श केल्यामुळे आपले हात भाजून निघाले. आपण राजे बनून सर्व राज्य सुखांचा उपभोग घेता. तुमचा मनावर संयम नाही. तुम्ही मनाच्या पलीकडे जाऊन अंतिम सत्याचा शोध घ्यायला पाहिजे. दाशार्ह राजाचे डोळे उघडले त्याला त्याची चूक कळाली. तो बोलला की मी राज्याचा कितीही विस्तार केला, मी कितीही उच्चप्रतीचे वस्त्र, अलंकार परिधान केले तरी मला कधीच आंतरिक समाधान मिळाले नाही, कधी मन तृप्त झालेच नाही. माझे सुद्धा मन-आत्मा परमपवित्र शांतीची अनुभूती प्राप्त करेल त्यासाठी मी काय करावे ते तूच आता मला सांग. मला या पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दे. भोलेबाबांचा हा मंत्र माझा सुद्धा उद्धार करेल. . राणी कलावती म्हणाली की तुमचे विचार ऐकून मला फार छान वाटले की तुम्ही पण साधना करू इच्छिता. साधनेने सर्व प्रकारचे पाप नाहीसे होतात. हृदय पवित्र होते. मी तर आपणास दीक्षा देऊ शकत नाही कारण की तुम्ही माझे पती परमेश्वर आहात. तुम्ही यादव कुळातील महान ऋषी गर्गमुनी यांना शरण जा. तेच तुमचे कल्याण करतील. राणीचे हे सर्व विचार ऐकून राजाला गर्गमुनींना भेटायची ओढ लागली. राजा व राणी गर्गमुनींच्या आश्रमात गेले. गर्गमुनींनी त्यांचा आदर-सत्कार केला आणि येण्याचे कारण विचारले. राजा म्हणाला की, आता पर्यंत माझ्या कडून खूप पापे घडली या पापाची जाणीव राणी कलावती मुळे मला आता झाली. हे गुरुवर्य मला शिष्यत्व देऊन आपली सेवा करण्याचा पुण्य प्राप्त करण्याचा मला अवसर प्रदान करावा. मला दीक्षा देण्याची कृपा करावी. मला आपणा कडून पंचाक्षरी शिव मंत्राची दीक्षा हवी आहे. जेणे करून माझ्या जीवनाचे सार्थक होईल राजा राणीने त्यादिवशी आश्रमातच विश्राम केला.
दुसऱ्या दिवशी राजा व राणी यांनी सकाळी उठून यमुना नदीत मंगलस्नान केले व शास्त्रोक्त पध्द्तीने वृक्षाखाली महादेवाचे अभिषेक-पूजन केले. गर्गमुनींची पूजा करून त्यांना दान दक्षिणा दिली. गर्गमुनींनी राजाला दीक्षा दिली राजांनी गुरूंचे दर्शन घेतले. सद्गुरुंच्या पवित्र स्पर्शाने राजांच्या जीवनात बदल झाले. गर्गमुनी राजाला म्हणाले की तूला दिलेल्या मंत्राचा अखंड जप कर म्हणजे जन्मोजन्मींचे पाप नाहीसे होऊन जाईल. नामाने हृदय शुद्ध व पवित्र होईल. राजा म्हणाले हे गुरुवर्य तुमच्या आशीर्वादाने माझे मन शांत झाले आहे. मला अत्यंत प्रसन्नतेची पवित्रतेचे शांततेची अनुभूती होत आहे. दाशार्ह राजांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांनी पुन्हा पुन्हा सद्गुरुंचे आभार मानले. राजाने सद्गुरुंच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले व साष्टांग प्रणाम करून राजा व राणी तेथून आपल्या राज्यात परत आले. राजाने अखंड मंत्र जाप सूरु ठेवला. त्यामुळे त्यांचे हृदय परम पवित्र होऊ लागले. राजाच्या हृदयाचे परिवर्तन पाहून प्रजेलाही आनंद झाला. त्यांच्या प्रांतात मोठ्या प्रमाणात शिवपूजा होऊ लागली. सर्व प्रजा सुखी होऊ लागली. अशा प्रकारे गुरुभक्तीमुळे राजा-राणी व प्रजा सर्वजण सुखी झाले. भगवान शिव यांचा पंचाक्षरी मंत्र व सद्गुरुंच्या कृपेने राजाचे जीवन बदलले. अशा या राजाची कथा जे नित्य वाचतील, त्यांनाही शिवशंकर साहाय्य करतील. राजा प्रमाणे जीवनातील दुःख नाहीसे होईल, प्रपंचही सुखाचा व आनंदी होईल.