पापनाशक आषाढी एकादशी

श्री विठ्ठल आरती

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा । चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ।।१।।
जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।धृ. ।।

तुळसी माळा गळा कर ठेवुनी कटी । कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी । गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।। जय देव ।।२।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा । सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा । ओवळिती राजा विठोबा सावळा।। जय देव ।।३।।

ओवाळू आरत्या कुर्वड्या येती । चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।४।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमध्यें स्नाने जे करिती।।
दर्शनहेळामात्रें तया होय मुक्ती। केशवासी नामदेव भावे ओंवळिती।। जय देव जय देव ।।५।।

आषाढी एकादशी

महाराष्ट्रात आषाढी एकादशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक भक्त विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. भाविक भक्त चंद्रभागेत स्नान करून विठु माऊलीचे दर्शन घेतात. आषाढीच्या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येथे येत असते.

आषाढी एकादशी कथा
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने देवाधी देव महादेवांची आराधना करुन त्यांना प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीहरी विष्णू यांना जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, या लढाईत श्रीहरी विष्णूचा पराभव होऊन ते देवाधी देव महादेवांकडे गेले पण महादेवही आपल्या वरामुळे हताश झाले होते. नंतर ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हदेव – विष्णुदेव – महादेव या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.

आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात आज पासून ते चार महिने पाताळात दैत्यराज बलीकडे निवास करतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते उठतात. तोपर्यंत चार महिने शयन करतात. श्रीहरी आजपासून योगनिद्रेत जाणार म्हणून या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात. यानुसार भाविक भक्त हे चार महिने व्रतस्थ राहतात. चातुर्मास व्रतारंभ आषाढी एकादशीच्या दिवशी पासुन होतो. याच दिवशी गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात. या नंतर पुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करण्यात येते. या चातुर्मासात गावागावात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

पंढरपूरची वारी
वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे स्वत:च वेगळे स्थान आहे. आषाढी एकादशी म्हटले की डोळयासमोर येते ती पंढरपुरची वारी. गेले शतकानुशतक शेकडो किलोमीटर चालत भक्तीेभावाने लाखोंचा समुदाय आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जमा होतो. संतांची नगरी महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाही याप्रमाणे तशी वारी करतात. भारताच्या आध्यात्मिक इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. बहुतेक वारकरी वारी पायी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते. आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते. गेल्या आठशे वर्षांपासून अधिक काळ ही वारी चालू आहे.

ज्ञानदीप क्लासेस पातुर्डाचा अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बु. येथील “ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये गावातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरीक आणि ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्राम विकास असे उपक्रम राबवल्या जातात.

पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस चे ‘गजानन उगले’ आणि त्यांचा संघर्ष ग्रुपच्या वतीने गावात वृक्षारोपण, जल सिंचन, स्पर्धा परीक्षा, तसेच लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी यांचे ग्रुपचे सदस्य नितीन खंडेराव, आकाश पालेवार, राम वैद्य, श्रीकृष्ण आमझरे, विशाल खोंड, सचिन भट, लखन पवार, कुशल दवे, शंकर अढाऊ, संदीप तायडे इ. परिश्रम घेत आहेत. ‘ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी या विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट खात्यात काही रक्कम जमा करतात. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरज असलेल्या वस्तू उपलब्ध करून देतात. याशिवाय गावातील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत करणे. गावात स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, जल सिंचन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

“ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप सोबत तंटा मुक्ती आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असतात. एमएच २८. इन टीमने काल ग्राम पातुर्डा येथे भेट दिली असता ज्ञानदीप क्लासेस चे गजानन उगले यांनी स्वागत केले आणि आपल्या उपक्रम बद्दल माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, निटनेटकेपणा आणि तेथील वातावरण प्रशंसनीय होते.
आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या या नवयुवकांचे कार्य असेच उत्साहाने व अखंडपणे सुरु राहल्यास लवकरच या गावाचा कायापालट होणार यात तीळ मात्र शंका नाही. एमएच २८.इन तर्फे या सर्व नवयुवकांचे अभिनंदन तसेच यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.

संत गाडगेबाबा ‘स्वच्छता महोत्सव’ जलंब माटरगाव येथे संपन्न

Buldana News

शेगाव तालुक्यातील ग्राम जलंब माटरगाव येथे आज दि. १९ नोंव्हेबर रोजी महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचा संत गाडगेबाबा स्वच्छता पालखी कार्यक्रम ‘स्वच्छता महोत्सव’ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या अंतर्गत पार पडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक गुरुदेव सेवा मंडळ आणि महालक्ष्मी कनिष्ठ महाविद्यालय, माटरगाव तसेच पूर्णाकला महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचायत समिती शेगांव येथील श्री. जाधव सर यांच्या निदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. स्थानिक बस स्थानक परिसरात आज सकाळी ११ वाजता ग्राम स्वच्छतेचे प्रणेते संत श्री गाडगेबाबा (डेबूजी झिंगराजी जानोरकर) यांच्या महानिर्वाण प्रसंगीचे स्मृती वाहन लोकांना स्वच्छतेकडे प्रेरित करीत होते. ज्या वाहनामध्ये संत गाडगेबाबा यांनी प्रवास केला ते त्यांचे स्मृतिचिन्ह ट्रकमध्ये सजविण्यात आले होते. ज्याप्रमाणे संत गाडगेबाबा आपल्या हातात खराटा घेऊन गावोगावात स्वच्छता करीत आणि आपल्या गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनातून स्वच्छतेसह जनजागृती करीत असत. त्याचप्रमाणे आज रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, कर्मचारी वृंद तसेच स्थानिक नागरिकांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन स्मरीत ग्राम स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला

गावागावात जाऊन ग्राम स्वच्छतेचा संदेश देणे आणि ग्राम हागणदारीमुक्त करण्यासाठी शासनाने हे अभियान हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने माटरगाव सह जलंब, पहूरजिरा यांसह इतर छोट्या मोठ्या गावात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

एसटी बसला अपघात – ४ ठार, १५ जखमी

आज शुक्रवारी भल्या पहाटे पावणेपाच वाजता एसटी बस व ट्रक च्या झालेल्या अपघातात ४ जण मरण पावले १५ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी मिरज ते पंढरपूर मार्गावर झाली. ही बस शेगाव वरुन सांगली कडे जात होती. अपघातात बसच्या उजव्या कडील भागाचा चेंदामेंदा झाला आहे.

एसटी महामंडळाची बस ही आज सकाळी सांगली कडे निघाली असताना शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता हा अपघात झाला. समोरून येणार्‍या ट्रक वर बस आदळल्याने बसचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, चार प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले तर १५ प्रवाशी गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. शुक्रवारी पहाटे पावणेपाच वाजता हा अपघात झाला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.