डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव पातुर्डा

ambedkar visit to buldana

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात वसलेल्या ग्राम पातुर्डाकडे अनेकांचे लक्ष नाही. शहरापासून दूर ग्रामीण भागात असलेल्या पातुर्डा गावास इतिहास लाभला आहे परंतु आज सर्व सुख सुविधा पासून गाव वंचित पडलेले आहे. गावास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून पावन झाले आहे.

पातुर्डा तसं मोठं गाव. शाळा, बाजार यांसह अनेक मंदिर, क्लासेस दिसून येतात. तसंच इतिहासकालीन अनेक स्थळ सुद्धा आपली साक्ष देत उभी आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर आहे. गावात गेल्यावर बाजारात एका ठिकाणी आपल्याला ती विहीर दिसून येते. त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेबांनी ही विहीर खुली केली होती. त्यांनी स्वतः या विहिरीचे पाणी काढून अस्पृश्याना दिले होते. पातुर्डा येथे आले असताना येथील जि.प. मुलांची शाळा येथे त्यांचा मुक्काम होता यावेळी त्यांच्याकरीता अंघोळीसाठी एक पाण्याचा हौद बांधण्यात आला होता. तो आता नाही आहे.

२५ मी १९२९ रोजी दोन दिवसीय अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब पातुर्डा येथे आले होते. त्यांच्यासोबत त्यावेळी रा.पी मटकर, रा. सोनोने, रा. मकेसर , रा. केशवराव खंडारे , रा. संभाजी जाधव, रायभान इंगळे इ. मंडळी हजर होती. मध्यप्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. यावेळी असंख्य जनसमुदाय जमलं होता. संध्याकाळी झालेल्या या अधिवेशनाच्या आरंभी रा . बथुरामजी दाभाडे यांची कन्या कु. कवतिकाबाई आणि सखाराम इंगळे यांचा विवाह सुधारलेल्या पद्धतीने व अल्प खर्चात करण्यात आला.

अस्पृश्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे, त्यांचा छळ करणे आणि बहिष्कार टाकणे यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील अस्पृश्य धर्मांतर करण्यास तयार झाले होते. त्या अनुषंगाने आपल्या अस्पृश्य बंधूचे यावर काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी जळगाव तालुक्यातील अस्पृश्य पुढाऱ्यांनी ही परिषद बोलावली होती. या अधिवेशनात ९ ठराव पास करण्यात आले. त्यामध्ये जळगाव तालुक्यातील अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्यास उत्तेजन, नागपूर का,को मध्ये प्रतिनिधींची मागणी, चिखली येथील जुने चोखामेळा बोर्डिंग हणून पाडण्याचा प्रतिष्टीत ब्राम्हणांनी चालु केलेल्या प्रयत्नाचा निषेध व नवीन निघणाऱ्या बोर्डिंगास मदत न करण्याविषयी विनंती, सरकारी व एडेड हायस्कुल मध्ये बहिष्कृत वर्गाचे सर्रास फी घेण्याविषयी मागणी, कामगार महारास पोलीस अधिकाऱ्याकडून होणार त्रास नाहीसा करण्यासाठी विनंती, मेलेल्या जनावरांचे मास गावात न आणण्याविषयी कायद्याने बंदी करण्यास सरकारला विनंती, अस्पृश्य वर्गाने चालविलेल्या बोर्डिंगास दर विद्यार्थ्यामागे ५ रु. प्रमाणे मदत करण्याविषयी व नागपूरचे बोर्डिंग सर्वस्वी चालविण्याविषयी सरकारला विनंती, टाईम्स मध्ये अस्पृश्य परिषदेचे रा. एल. एस,. भटकर यांच्या निधनाची खोटी बातमी छापल्याने बातमीदाराचा निषेध आणि श्री. दाभाडे यांनी या परिषदेचा खर्च एकट्याने भरल्याबद्दल त्यांचे अभिनंदन असे ठराव एकमताने पास करण्यात आलॆ.

ज्ञानदीप क्लासेस पातुर्डाचा अभिनव उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संग्रामपूर तालुक्यातील ग्राम पातुर्डा बु. येथील “ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप यांनी एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये गावातील गोर-गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी, वयोवृद्ध नागरीक आणि ग्रामस्थांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि ग्राम विकास असे उपक्रम राबवल्या जातात.

पातुर्डा येथील ज्ञानदीप क्लासेस चे ‘गजानन उगले’ आणि त्यांचा संघर्ष ग्रुपच्या वतीने गावात वृक्षारोपण, जल सिंचन, स्पर्धा परीक्षा, तसेच लेक वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी यांचे ग्रुपचे सदस्य नितीन खंडेराव, आकाश पालेवार, राम वैद्य, श्रीकृष्ण आमझरे, विशाल खोंड, सचिन भट, लखन पवार, कुशल दवे, शंकर अढाऊ, संदीप तायडे इ. परिश्रम घेत आहेत. ‘ज्ञानदीप क्लासेस’ च्या वतीने श्री. गजानन उगले सर हे ज्यांचे पितृछत्र हरवले आहे अशा गरीब मुलांना मोफत शिक्षण देतात आणि उगले सर आणि त्यांचे सहकारी या विद्यार्थ्यांच्या नावे पोस्ट खात्यात काही रक्कम जमा करतात. तसेच त्यांना शैक्षणिक साहित्य आणि गरज असलेल्या वस्तू उपलब्ध करून देतात. याशिवाय गावातील वयोवृद्ध दाम्पत्यास मदत करणे. गावात स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, जल सिंचन असे विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

“ज्ञानदीप क्लासेस” आणि संघर्ष ग्रुप सोबत तंटा मुक्ती आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावात जनजागृती पर कार्यक्रम राबविण्यात येत असतात. एमएच २८. इन टीमने काल ग्राम पातुर्डा येथे भेट दिली असता ज्ञानदीप क्लासेस चे गजानन उगले यांनी स्वागत केले आणि आपल्या उपक्रम बद्दल माहिती दिली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना लावलेली शिस्त, निटनेटकेपणा आणि तेथील वातावरण प्रशंसनीय होते.
आपल्या गावाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या या नवयुवकांचे कार्य असेच उत्साहाने व अखंडपणे सुरु राहल्यास लवकरच या गावाचा कायापालट होणार यात तीळ मात्र शंका नाही. एमएच २८.इन तर्फे या सर्व नवयुवकांचे अभिनंदन तसेच यांच्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.