कथा महाशिवरात्रीची

प्राचीन काळी एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. एक दिवस शिकारीसाठी तो जंगलात गेला. जंगलात खुप फिरला पूर्ण दिवस निघून गेला पण एकही शिकार त्याच्या हाती नाही लागली. तो एका नदी काठी पोहचला तेथे तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला व एखादा प्राणी पाणी पिण्यास आल्यास आपण त्याची शिकार करू असा त्याने विचार केला. बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होते ते बेलाच्या पानाने झाकल्या गेलेले होते. याची शिकाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. तो तेथे झाडावर बसला व वाट बघू लागला. पण बराच वेळ झाला तरी तिथे एकही प्राणी फिरकला नाही. तो अस्वस्थ झाला. व अस्वस्थतेत तो बेलाचे पान तोडत असे व फेकत असे ते पान शिवलिंगावर पडत होते. तो दिवस होता महाशिवरात्रीचा.

तो सकाळ पासुन उपाशीच होता. त्यामुळे त्याचा उपास घडला. व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित झाले. न कळत पुण्याची प्राप्ती त्याला झाली.  मध्य रात्री एक हरीण पाणी प्यायला आली. शिकाऱ्याने धनुष्यावर तिर लावला नेम धरला आणि तो तिर सोडणार तर ती हरीण बोलली की मी गर्भिणी आहे मी बाळाला जन्म देणार आहे. माझी शिकार करू नको मी माझे बाळ झाल्यावर लगेच परत येईल तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याला तिचे सत्यवाचन वाटले त्याने तिला जाऊ दिले.  काही वेळाने आणखी एक हरीण पाणी पिण्या करता तेथे आली. ती हरीण बोलली माझी शिकार करू नको. मला माझ्या पतीच्या सहवासाची इच्छा आहे. मी माझ्या पतीस भेटून येते तेव्हा तू माझी शिकार कर. शिकाऱ्याने तिला पण जाऊ दिले. दोन्ही शिकार जाऊ दिल्यामुळे त्याचे डोके आणखी खराब झाले.  काही वेळाने पुन्हा एक हरीण तिच्या पिल्लांना घेऊन पाणी पिण्या करता आली. तेव्हा शिकाऱ्याने लगेच तिच्या वर नेम लावला व तो बाण सोडणार तर ती हरीण बोलली की माझी शिकार करू नको मला माझ्या पिल्लांना माझ्या पती जवळ सोडून परत येते. शिकारी हसला आणि बोलला हातातली शिकार सोडून देऊ एवढा मी मूर्ख नाही. पुन्हा हरीण बोलली की मला माझ्या पिल्लांची चिंता होत आहे मला जाऊ दे. मी माझ्या पिल्लांना घरी सोडून लगेच येते शपथ घेऊन सांगते. त्याला तिच्या पिल्लांना पाहुन दया आली त्याने तिला जाऊ दिले .

शिकारी त्या हरिणीची वाट पाहत होता व बेलाचे पान तोडत शिवलिंगावर फेकत होता. तेवढ्यात एक मोठा हरीण तेथे आला. शिकारी आनंदित झाला व त्याने त्याच्या वर नेम लावला व बाण सोडणारच तर तो हरीण बोलला की माझे जर तू पिल्लं व तीन पत्नी ची शिकार केली असेल तर माझी शिकार कर व मला मारून टाक. जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला पण काही वेळे करता जीवन दान दे. मी त्यांना भेटून लगेच येतो तेव्हा माझी शिकार कर.  तेव्हा शिकाऱ्याच्या समोर संपूर्ण रात्रीचे दृश्य समोर आले. दृष्टी समोर जे घडले ते दृश्य फिरू लागले  त्याने जे झाले त्या हरिणांस सांगितले. हरीण बोलला की जसे माझ्या पत्नीने तुला वचन दिले मी पण तुला वचन देतो की मी त्यांना भेटून त्यांना येथे घेऊन येतो तेव्हा तू आमच्या सर्वांची शिकार कर. तेव्हा शिकाऱ्याने त्याला पण जाऊ दिले.

थोडयाच वेळाने तो हरीण सहकुटूंब त्याच्या समोर आले. उपवास, रात्री जागरण व अजाणते पणे त्याच्या कडून शिवलिंग वर बेल पत्र अर्पित केल्याने त्याचे मन निर्मळ झाले. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडला. त्याला त्याच्या आता पर्यंतच्या कर्माचा पश्चाताप होत होता. भगवान शिव शंकरच्या कृपेने त्याचे मन द्रवित झाले त्याचे हृदय परिवर्तन झाले होते. हिंसक प्रवृतीतून करुणेचा भाव निर्माण झाला होता.  हरिणाच्या कुटुंबीयांची प्रामाणिकता, सत्यता व सामूहिक प्रेम भावना पाहून तो धन्य झाला होता. त्याने हरणाच्या कुटूंबाला जिवंत सोडून दिले. तेव्हा पासून शिकार पण सोडून दिली असा तो बोलला. वरून समस्त देवी देवता हे पाहत होते. समस्त देवी देवतांनी त्याच्या वर व हरीण परिवारावर फुलांचा वर्षाव केला. व भोले बाबांचा कृपाप्रसाद त्यांना प्राप्त झाला. अशाप्रकारे अजाणतेपणाने पण ईश्वर सेवा घडली तरी करुणामयी भोलेबाबा प्रसन्न होतात. आणि आजच्या दिवशी आपण हि महाशिवरात्रीची कथा वाचणार म्हणजे त्यांचे अजाणतेपणे स्मरण होणार त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपणास नक्कीच लाभेल.

महाशिवरात्रीच्या सर्व एमएच २८. इन सदस्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

पापनाशक बारा जोतिर्लिंग

१२ जोतिर्लिंग: महाशिवरात्री

भगवान शंकर त्रिदेवांपैकी एक.आहेत. यांना भोलेबाबा, भोलेनाथ, नीलकंठ, रुद्र, महेश, शिव, शंकर, महादेव अशा विविध नावांनी यांचे स्मरण केले जाते. यांची अर्धांगिनी शक्ती आहे त्यांचे नाव पार्वती आहे. यांचे पुत्र कार्तिकेय आणि श्रीगणेश आहेत. भगवान शंकराची पूजा शिवलिंग आणि मूर्ती अशा दोन्ही रूपात केली जाते. त्यांच्या गळ्यात नाग देवता विराजमान आहेत. हातात डमरू आणि त्रिशूल धारण केलेले आहे. कैलास त्यांचे निवासस्थान आहे. असे हे देवांचे देव महादेव ज्या ठिकाणी स्वतःहून प्रकट झाले त्या बारा ठिकाणी असलेल्या शिवलिंगला बारा जोतिर्लिंगाच्या रूपात पुजल्या जाते. हिंदू मान्यतेनुसार जो मनुष्य प्रतिदिन नित्य प्रातःकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळी बारा जोतिर्लिंगांचे स्मरण करतो त्याचे साताजन्माचे पाप यांच्या स्मरणाने नष्ट होतात. असे सांगितल्या जाते कि देवाधी देव महादेव यांचे १२ ज्योतिर्लिंग चे दर्शन करणारा व्यक्ती खुप भाग्यशाली असतो. या बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे ज्याच्या नशीब आहे तोच करू शकतो.
तसेच आज २४ फेब्रुवारी २०१७ ला महाशिवरात्री आहे आणि या पावन मुहूर्तावर जर आपण थोडं पुण्य अर्जित करू शकलो तर आपले जीवन सुद्धा धन्य होईल त्यामुळे आज आपण भोलेबाबांच्या १२ जोतिर्लिंगाची माहिती बघणार आहोत. बारा जोतिर्लिंगांची नावे व ते कुठे स्थित आहेत.

१) श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे आहे. काठेवाडच्या दक्षिणेस वेरावल बंदरगाहयेथे स्थित आहे. याचे निर्माण चंद्रदेवाने केले होते. सोम म्हणजे चंद्र आणि त्यांनी हेनिर्माण केले म्हणून याचे नाव सोमनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. हे पृथ्वी वरील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते.

२) श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्या मध्ये कृष्णा नदी काठी श्रीशैल नावाच्या पर्वता वर आहे. यास श्री शैल मल्लिकार्जुन नावाने पण ओळखले जाते.

३) श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काठा वर आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची विशेषतः म्हणजे एकमेव दक्षिण मुखी ज्योतिर्लिंग आहे.

४) श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश राज्या मध्ये मान्धाता नागरी मध्ये विराजमान आहे या तीर्थस्थानाजवळच नर्मदा नदी आहे. हा सर्व भाग ओंकार आकाराचा आहे म्हणून याला ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाते.

५) श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्या मध्ये हिमालय पर्वत रांगे मध्ये हे तीर्थक्षेत्र आहे. बद्रीनाथ चार धाम पैकी एक आहे. बद्रीनाथचे दर्शन घेण्यास आलेले केदारनाथच्या दर्शन घ्यायला येत असतात. काहीकाळ हे मंदिर बर्फामध्ये बुडालेले असते.

६) श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये पुण्याहून ११० किमी वर स्थित असून. सह्याद्रि पर्वत रांगेत आहे. येथे भीमा नदी वाहते.

७) श्री काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेश राज्या मध्ये काशी येथे आहे. काशीलाच वाराणसी, बनारस असे म्हणतात. गंगा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.

८) श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्या मध्ये नासिक जिल्हात गोदावरी नदीच्या जवळ आहे.

९) श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग झारखण्ड राज्या मध्ये अतिप्रसिद्ध देवघर येथे स्थित आहे.

१०) श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात दारूका जंगला जवळ आहे. द्वारकापुरी येथून जवळच आहे.

११) श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग तमिलनाडु राज्यात रामनाथपुरं येथे आहे. हे चार धाम पैकी एक आहे. या ज्योतिर्लिंगची स्थापना स्वतः भगवान श्री रामचंद्रांनी केली होती त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला रामेश्वरम हे नाव पडले.

१२) श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग – हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यात दौलताबाद च्या जवळच आहे. येथे जवळच शिवकुंड सरोवर आहे. बारा ज्योतिर्लिंग मध्ये हे शेवटचे ज्योतिर्लिंग आहे.

महाशिवरात्रीच्या आपणा सर्वांना एमएच २८. इन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा