बछडे खाणारे रक्तपिपासू पिशाच्च

आजकाल जास्त भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत किंवा आपण ही कधीतरीच असे विषय काढतो . शहरी भागात भूत आता फक्त पुस्तक आणि आणि आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टींमध्येच उरले आहेत . असो, आज मी जो अनुभव सांगणार आहे तो माझ्यासोबत घडला आहे. तेव्हा मी ८ वीला शिकत होतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे जायचो. मामा , मामी , आजी असे सर्व जण तिथे असायचे सोबत मामाची मुले त्यामुळे मज्जाच मज्जा असायची. मामीचे घर जुने होते परंतु खूप मोठे , समोर छोटीशी बाग, आणि बाजूला गुरांचा वाडा. तिथे लहान मुलांना जाण्यास बंदी केली होती . म्हणून मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने सांगितले की गेल्या ६ महिन्यापासून जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो २ दिवसात मरतो. आणि त्यामुळे गाई सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे गेला कि त्याला शिंग मारायला येतात . म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका . तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या . आणि त्या दिवशी अजून एक बछडा जन्माला आला . आम्ही मुल आनंदी झालो पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण सकाळी तो बछडा मृत अवस्थेत वाड्यात पडला होता. आता सहन शक्ती संपली होती मामाने आजीला सांगितलं की हे काही साध सुध नाही आहे . नक्कीच काहीतरी भयानक आणि अमानवीय घडतंय आपण मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात. मांत्रिक आला आणि जसा त्याने त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश केला तसा त्याला विचित्र अनुभव आला. तो लगेच बाहेर पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे उद्या सकाळी सकाळी मी इथे येतो आणि काय करायचं ते बघतो . दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता तो मांत्रिक आला . मी जागीच होतो कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे हे मला सुद्धा जाणून घ्यायचे होते . तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत आणि नंतर विहिरी जवळ गेला त्याच्या हातात एक काठी होती . विहिरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला . थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद करून उभा राहिला . आणि नंतर घरी आला आणि आजीला सांगितले . हे प्रकार साधेसुधे नाहीत. बछडे मरत आहेत कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत . तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग गाई का मरत नाहीत फक्त बछडे का मरतायत . त्यावर तो म्हणाला प्रत्येक पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत . त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्याचेच तो प्राण घेतोय . तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक पूजा घातली की सगळ ठीक होईल . त्यामुळे ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने सांगितलं की पूजा आता चालू करू. पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने पूजेच्या सामानाची यादी मामाकडे दिली . थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु केली तो जोरजोरात कसले तरी विचित्र मंत्र म्हणत होता . त्यावेळी ज्या घटना झाल्या त्याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता . अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुद्धा! आम्हाला वाटल की कोणी तरी मस्ती करत असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच, लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव होऊ लागला. मामा धावत जाऊन घरावर चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरी सुद्धा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत होता तसा आता दगडांचा वर्षाव थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले . पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज झाला आणि घाण वास सुधा येवू लागला मामाने बाहेर जावून पहिले आणि तो चक्रावला कारण आता घरावर चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२ वाजता थांबवली . मांत्रि
काने सांगितलं जे काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू नका . मी उद्या येईन परत . त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव होतच होता. पण मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले की यावर काही उपाय करा . तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते चालूच राहणार . पूजा करताना अनेक विघ्न पण त्याने पूजा चालूच ठेवली आता दगड मातीचा वर्षाव थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच मारतय. ३ वाजता त्याने पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला. उरलेला १ खिळा त्याने घरच्या उंबरठ्याला ठोकला आणि अचानक चक्कर येऊन तिथेच पडला. लोकांनी त्याला उचलले आणि तोंडावर पाणी मारले. थोड्या वेळाने शुद्धीत आल्यावर तो म्हणाला आता ते पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते . त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह नसलेला बरा. त्या दिवशी पासून त्या घटना बंद झाल्या. त्या नंतर पुन्हा कधीच गायीच्या बछड्याचा मृत्यू झाला नाही.

 

ही कथा फक्त मनोरंजनासाठी असून एमएच २८.इन अशा कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अथवा याच्याशी एमएच २८.इन चा कुठलाही संबंध नाही.