बुलडाणा औरंगाबाद बस ब्रेक डाउन

Buldhana ST buses

बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस अचानक सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर औरंगाबाद येथून बुलडाणा कडे येणाऱ्या प्रवाशांना औरंगाबाद बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले. यामुळे प्रवाशी रोष व्यक्त करताना दिसून आले. दुपारी ३.३० वाजता बुलडाणा येथून औरंगाबाद करीता फेरी आहे. सदर बस औरंगाबाद येथे रात्री ७. ३० वाजता पोहोचते आणि परत बुलडाणा कडे परतीच्या प्रवासास निघते. रात्री ७. ४५ ला औरंगाबाद हुन सुटणारी ही शेवटची बस आहे. परंतु ही फेरी अनेकदा नियमित असल्याची तक्रार प्रवाशी करतांना दिसून येतात.

आज बुलडाणा येथून औरंगाबाद ला निघालेली बस वेळेप्रमाणे बुलडाणा बस स्थानकावरून सुटली होती परंतु सिल्लोड नजीक ब्रेक डाऊन झाल्याने पुढील प्रवासास बस मार्गस्थ होऊ शकली नाही. परिणामी या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मागून येणाऱ्या बुलडाणा ते नाशिक बस मध्ये बसून देण्यात आले. या बाबत बुलडाणा आगारा सोबत संपर्क केला असता त्यांना झालेल्या प्रकाराची कुठलीही माहिती नसल्याचे समजते. या बसच्या प्रतीक्षेत असलेले अनेक प्रवाशी औरंगाबाद येथे अडकून पडलेले होते. औरंगाबाद येथील चौकशी कक्षात संपर्क केल्यावर बस रद्द झाल्याचे समजले. याशिवाय सदर फेरी बंद झाली असे सुद्धा औरंगाबाद येथील चौकशी कक्षात बसलेले अधिकारी प्रवाशांना सांगत असताना दिसून आलेत. सदर बस अनेक वेळा उशिरा धावतांना दिसून येते तर काही वेळेस कुठलीही सूचना न देता फेरी रद्द केल्या जाते. निदान या बस ला नियमित करावे किंवा बसमध्ये बिघाड असल्यास दुसरी बस या मार्गावर देण्यात यावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.

औरंगाबाद येथे तणाव आणि संचारबंदीची अफवा

aurangabad riot in osmanpura

भीमा कोरेगाव इथं विजय स्तंभास अभिवादन करताना घडलेल्या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद येथे सुद्धा पाहावयास मिळाले. औरंगाबाद शहरातील मुख्य क्रांती चौक भागासह अनेक ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. तसेच औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरात संचारबंदी लागू झाल्याही अफवा सुद्धा पसरली होती. परंतु तसे काही झाले नाही.
औरंगाबाद शहरातील सर्व मुख्य चौकात आणि ठिकठिकाणी पोलिसांचा पहारा असून सर्व परिस्थितीवर आयुक्त यशस्वी यादव नजर ठेवून आहेत. परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी आणि कुठलेही अनुचित कार्य न घडण्यासाठी राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव येथे दलित संघटनांतर्फे १ जानेवारी हा शौर्य दिनम्हणून साजरा केला जात आहे. त्यासाठी भीमा कोरेगावात हजारो लोक जमले होते. . १ जानेवारी १८१८ला पुण्याजवळ भीमा कोरेगावात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या घटनेला आज २०० वर्ष पूर्ण झाल्याने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रम दरम्यान काही समाजकंटकांनी आज गाड्यांवर दगडफेक केली. रस्त्यावर टायरही जाळण्यात आले. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचे पडसाद आज औरंगाबाद मध्ये सुद्धा पहावयास मिळाले.

थोडा तणाव उस्मानपुरा, टीव्ही सेंटर भागात निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी परिस्थिती तांबडतोड नियंत्रणात आणली. दरम्यान शहरातील अनेक दुकाने संध्याकाळपासूनबंद होती तर क्लासेस आणि ऑफिस ला लवकर सुटी देण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसून येत होता.

औरंगाबाद डेपोच्या कर्मचाऱ्यांमुळे नाशिक ते बुलडाणा बस २. ३० तास लेट

ST bus nashik to buldhana

पंक्चर झालेल्या एसटी बसचे चाक दुरुस्त करून देण्यास उशीर केल्याने थोडा नव्हे तर तब्ब्ल अडीच तास प्रवाशांचा खोळंबा होऊन मानसिक त्रास होण्याची घटना औरंगाबाद येथे घडली. रविवार दि. २४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे नाशिक येथून बुलडाणा येथे जाण्यासाठी निघालेली बस औरंगाबाद स्थानकात पोहोचली. दुपारी १२ वाजता ही बस बुलडाणा कडे निघाली असतांना बस स्थानका बाहेरच बसच्या मागील उजव्या बाजूचे टायर पंक्चर असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.
त्यामुळे बस प्रवाशांसह पुन्हा बस स्थानकात घेऊन जाण्यात आली. त्याठिकाणी औरंगाबाद आगारात बस पंक्चर साठी घेऊन गेले असतांना दुसऱ्या डेपोची बस असल्याने कर्मचाऱ्यांनी त्वरित काम करून देण्यास नकार दिला.

नाशिक ते बुलडाणा ही लांब पल्ल्याची बस असून ती प्रवासात असतांना पंक्चर झाली होती. त्यामुळे सदर बस पंक्चरसाठी औरंगाबाद आगारात नेली. त्या ठिकाणी गाडीचे पंक्चर काढण्यास प्राधान्य न देता; आगारातील कर्मचाऱ्यांनी इतर कामासाठी डेपोमध्ये थांबलेल्या गाड्यांकडे लक्ष दिले. यामुळे नाशिक ते बुलडाणा जात असलेल्या गाडीस १०-१५ मिनिटे नव्हे तर तब्बल २. ३० तास औरंगाबाद मध्ये उशीर झाला. अखेर पावणे तीन च्या सुमारास बस पुढील प्रवासास मार्गस्थ झाली. याठिकाणी औरंगाबाद येथील आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर सुद्धा विलंब केला. अखेर वैतागलेल्या नाशिक ते बुलडाणा बसच्या चालक आणि वाहकांनी स्वतः गाडीचे चाक खोलून दिले परंतु कर्मचारी त्या नंतर जेवणास निघून गेल्याने बसचे पंक्चर राहून गेले. कर्मचारी जेवून आल्यानंतर पंक्चर काढण्यात आले . त्यामुळे २. ४५ च्या सुमारास बस बुलडाणा कडे मार्गस्थ झाली. परंतु कर्मचाऱ्याच्या दिरंगाईमुळे, ३.३० ला बुलडाणा येथे पोहोचून पुन्हा नाशिक कडे जाणाऱ्या ह्या बसला बुलडाणा येथे पोहोचण्यासच संध्याकाळचे ६. ३० वाजले होते.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळात व्यवस्थापक पदासाठी भरती

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (MSRDC) तर्फे सध्या बुलडाणा, जालना, अहमदनगर, नाशिक, वर्धा, नागपुर, औरंगाबाद व वाशिम या ठिकाणी व्यवस्थापक (Manager) पदासाठी भरती करण्यात येणार आहे. (Contract Basis) कंत्राटी पद्धतीने 05 वर्षे करीता एकूण १६ जागांकरिता भरती करण्यात येणार असून त्यासाठी उमेदवार हा Civil Engineering (BE) पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास सम्बंधित क्षेत्रातील 03 वर्षे अनुभव असावा. उमेदवारास संगणकाचे ज्ञान (Excel, Powerpoint ) असणॆ आवश्यक आहे.

पद नाम (Post Name) : व्यवस्थापक
जागा तपशील (Post Details) :
खुला (Open) – ०८ जागा
अ.जा. (SC)- ०२ जागा
अ.ज. (ST)- ०१ जागा
वि.जा.(अ) (VJ-A)- ०१ जागा
भ.ज.(ब) (NT-B) – ०१ जागा
इ.मा.व. (OBC)- ०३ जागा

वेतनश्रेणी : ठोक वेतन : दरमहा रु.50,000/- + शासकीयनियमानुसार घरभाडे भत्ता.
वय मर्यादा (Age Limits) : खाजगी क्षेत्रातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 35 वर्षे पर्यंत. शासकीय / निमशासकीय / केंद्र शासनातील उमेदवार असल्यास वयोमर्यादा कमाल 62 वर्षे पर्यंत.

उमेदवाराने अर्ज हे जाहिरातीत दिलेल्या अर्ज नमुन्यात अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर पोच देय डाकेने सादर करावा.
अर्ज करण्याचा पत्ता खालीलप्रमाणे :
General Manager (Administration),
M.S.R.D.C. (Ltd), Opp. Bandra Reclamation Bus Depot,
Near Lilavati Hospital,
Bandra (W), Mumbai – 400 050.

यासंबंधी अधिक माहितीसाठी www.msrdc.org ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट दयावी.  जाहिरातीसाठी दिलेली लिंकवर क्लिक करा अथवा आपल्या ब्राऊजर मध्ये ओपन करा.
http://www.msrdc.org/Site/Upload/Images/ManagerforNMSCEW.pdf

बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात

Buldhana District official website

बुलडाणा येथून पुणे ला जाणाऱ्या रात्री ९. १५ च्या बुलडाणा-पुणे बस ला औरंगाबाद जवळ अपघात झाला. अपघातात बसमधील १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. एम एच १८ बीटी ४२९४ क्रमांकाची बुलडाणा-पुणे ही बस काल नेहमीप्रमाणे बुलडाणा येथून रात्री ९. १५ प्रवाशी घेवून निघाली. रात्री २ वाजे दरम्यान औरंगाबादहून पुण्याकडे सदर बस मार्गस्थ झाली असताना औरंगाबाद ते पुणे मार्गावर वाळूज जवळील चौकात भरधाव येत असलेल्या ट्रकने बुलडाणा-पुणे बस ला वाहकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात १७ प्रवाशी जखमी झाले आहेत. सर्व प्रवाश्यांना औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गाडीचे भरपूर नुकसान झाले आहे. बुलडाणा-पुणे बसचे चालक व वाहक मात्र या अपघातात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर लागलीच औरंगाबाद आगाराने तडक घटनास्थळी जावून सहकार्य केले.

लय भारी च्या प्रमोशन दरम्यान १५ जखमी

अभिनेता रितेश देशमुख आपल्या आगामी “लय भारी” चित्रपटाच्या प्रमोशन्स साठी औरंगाबाद मध्ये आला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 15 जखमी झाले. औरंगाबाद येथील प्रोझोन मॉलमध्ये रितेश येणार अशी खबर मिळाल्याने अनेक तरुण-तरुणी मॉल मध्ये जमलेले होते. प्रोझोनचे तिन्ही जिने आणि फुटकोर्ट गर्दीने फुलून गेले होते. मात्र, रितेश आल्यानतंर त्याला एक नजर डोळा भरून पाहाण्यासीठी चाहत्यांनी रेटारेटी सुरु केली आणि गोंधळ उडाला. अनेकांचे कपडे फाटले तर, काहींचे महागडे मोबाईल आणि इतर वस्तू हरवल्या. मॉलमधील मुख्य स्क्रीनसमोर रितेश येऊन उभा राहिल्यानंतर तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले. त्यातच हा प्रकार घडला. चाहत्यांची गर्दी एवढी होती की, उपस्थित असलेली पोलिस सुरक्षा व बाउन्सर कमी पडलेत त्याना गर्दी आवरने मुश्कील झाले होते.